

शहापूर : मुंबईला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील तानसा, वैतरणा, मोडकसागर धरण भरल्यानंतर भातसाही शनिवारी भरून वाहू लागले आहे. ०.२५ मीटरने धरणाचे पाचही वक्र दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
शहापूर तालुक्यामध्ये सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणांची पाणीपातळी झपाट्याने वाढून-तालुक्यातील सर्वच धरणे भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
तानसा, वैतरणा, मोडकसागर ही धरणे आधीच भरून वाहू लागलेले असताना भातसा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने आज दुपारी एक वाजता विधिवत पूजा करून नदीला साडी चोळी अर्पण करून ओवर फ्लो करण्यात आला. त्यामुळे मुंबईला सर्वात जास्त पाणीपुरवठा करणारे हे धरण भरून वाहल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
पाण्याचा वेग झपाट्याने वाढत असल्याने धरणाचे पाच वक्र दरवाजे उघडून ०. २५ मीटरने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यावेळी शहापूर मुरबाड तालुक्यातील नदी पात्र लगत गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. यावेळी शहापूरचे आमदार दौलत दरोडा, भातसा धरण व्यवस्थापक विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.