लाईफस्टाईल

Diwali Special : गोडधोड टिकवायचंय जास्त दिवस? फराळ टिकवण्याचे खास दिवाळी सिक्रेट्स!

दिवाळी म्हटली, की घराघरात गोडधोडाचा सुगंध दरवळतो. लाडू, करंजी, चकली, शंकरपाळी, मोहनथाळ, बालुशाही…अशा असंख्य पदार्थांची रेलचेल असते. पण, अनेकदा हे स्वादिष्ट पदार्थ काही दिवसातच खराब होतात आणि सगळ्या मेहनतीवर पाणी फिरतं.

नेहा जाधव - तांबे

दिवाळी म्हटली, की घराघरात गोडधोडाचा सुगंध दरवळतो. लाडू, करंजी, चकली, शंकरपाळी, मोहनथाळ, बालुशाही…अशा असंख्य पदार्थांची रेलचेल असते. पण, अनेकदा हे स्वादिष्ट पदार्थ काही दिवसातच खराब होतात आणि सगळ्या मेहनतीवर पाणी फिरतं. खरंतर, गोड पदार्थ साठवणं हीसुद्धा एक कला आहे. काही छोट्या टिप्स पाळल्या, तर दिवाळीचं गोडधोड पूर्ण आठवडा ताजं राहू शकतं!

१. हवाबंद डब्यांचे सामर्थ्य

गोड पदार्थ जास्त काळ टिकवायचं असेल, तर हवाबंद डबे हे सर्वोत्तम उपाय आहेत. हवा आणि ओलावा हे गोड पदार्थांचे शत्रू आहेत. त्यामुळे फराळाचे पदार्थ हवाबंद डब्यात साठवले, तर ते ताजे आणि कुरकुरीत राहतात. स्टीलपेक्षा काचेचे डबे अधिक चांगले मानले जातात, कारण त्यात ओलावा टिकत नाही.

२. मावा मिठाईसाठी कोरडे हात अत्यावश्यक

मावा (खवा) वापरून बनवलेले पेढे, बर्फी, कलाकंद असे पदार्थ सर्वाधिक लवकर खराब होतात. त्यांना पाणी लागणं टाळणं अत्यंत गरजेचं आहे. मावा मिठाईला कोरड्या हातानेच हाताळा आणि फ्रिजमध्ये साठवताना झाकण घट्ट लावा. थोडं वेलची पूड किंवा साखरेची पावडर शिंपडल्यास बुरशी होण्याची शक्यता कमी होते.

३. शंकरपाळी, बालुशाही, मोहनथाळसाठी काचेच्या बरण्या

कोरडी मिठाई जसे शंकरपाळी, बालुशाही, मोहनथाळ यांना हवाबंद काचेच्या बरण्यांमध्ये ठेवणे उत्तम. अशाने गोडधोडाला 'पाणी सुटत' नाही आणि ते कुरकुरीत राहतात.

४. थर लावा आणि चव जपा

एकाच डब्यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ठेवताना त्यांच्यामध्ये कागदाचे थर ठेवा. त्यामुळे ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि त्यांच्या चवींचा गोंधळ होत नाही.

५. ओलावा टाळा, तळणी यशस्वी ठेवा

फराळ करताना वापरण्यात येणारे पोहे, बेसन, रवा, खोबरे हे साहित्य पूर्णपणे कोरडे असणे आवश्यक आहे. ओलावा राहिला, तर करंजीसारखे पदार्थ तळताना फुटतात. करंजीच्या कडा चिकटवण्यासाठी मैदा आणि पाण्याची पेस्ट वापरा ती अधिक घट्ट राहते आणि करंजी फुलून सुंदर तळली जाते.

६. फ्रीजरमध्ये टिकवा ताजेपणा

बर्फी, लाडू किंवा मावा-आधारित मिठाई दीर्घकाळ टिकवायची असेल, तर ती फ्रीजर-सेफ कंटेनरमध्ये गोठवा. खाण्यापूर्वी १५-२० मिनिटे डीफ्रॉस्ट करा, चव तशीच राहते आणि मिठाई नव्यासारखी दिसते.

७. थंड झाल्यावरच साठवा

फराळाचे पदार्थ तळल्यावर किंवा भाजल्यावर लगेच डब्यात भरू नका. ते पूर्णपणे थंड झाल्यावरच साठवा. गरम असताना साठवल्यास त्यात ओलावा निर्माण होतो आणि पदार्थ मऊ पडतात.

दिवाळी म्हणजे आनंद, फटाके, रांगोळी आणि मिठाईचा संगम. पण या गोड सणाचा आनंद अख्खा आठवडा टिकवायचा असेल, तर योग्य साठवणूक हेच गुपित आहे. थोडी काळजी, थोडी कल्पकता आणि योग्य डबे हेच दिवाळीच्या गोडधोडाचे खरे सिक्रेट्स आहेत!

संजय राऊतांच्या वक्तव्याने मनसेत नाराजी, संदीप देशपांडे म्हणाले, "आमच्या पक्षाची भूमिका...

विरारमध्ये ‘वचनपूर्ती जल उत्सव’ कार्यक्रमासाठी रस्ता अडवल्याने गोंधळ; भाजप, बविआ आणि नागरिकांमध्ये संघर्ष

Mumbai : खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड; तातडीने रुग्णालयात दाखल

Thane News : कबूतराला वाचवायला गेला, अग्निशामक जवानाने जीव गमावला; २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, परिसरात हळहळ

Diwali Rangoli Ideas : पारंपरिक ठिपक्यांपासून मॉडर्न डिझाइन्सपर्यंत! घर सजवण्यासाठी रांगोळीचे खास पर्याय