मुंबई : विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर वर्षभर केवळ `तारीख पे तारीख`च सुरू आहे. शुक्रवारी पुन्हा मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती मिलींद साठ्ये यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी सोमवारी, ७ ऑक्टोबर रोजी निश्चित केली आहे. खंडपीठाने यापूर्वी पुढील आदेशापर्यंत नवीन नियुक्त्या करू नका, असा अंतरिम आदेशच राज्य सरकारला दिला असल्याने या नियुक्त्या लांबणीवर पडल्या आहे.
विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने नावांची शिफारस करून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तशी यादी पाठवली. या आमदारांच्या नियुक्त्या करण्यात राज्य सरकार चालढकलपणा करत आहे, असा आरोप करून शिवसेनेचे (ठाकरे) कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी याचिका दाखल केली आहे.