अभिषेक पाठक/मुंबई
राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या भीषण अपघातांमध्ये ‘गोल्डन अवर’ (अपघातानंतरचा पहिला तातडीचा तास) मध्ये रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्र सरकार आता ‘एअर ॲम्ब्युलन्स’ (हवाई रुग्णवाहिका) सेवा सुरू करण्याच्या हालचाली करत आहे. राज्याच्या परिवहन विभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीसमोर सादर केला आहे.
महाराष्ट्र सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल २०२६ या चार महिन्यांत राज्यात १२,३८९ रस्ते अपघात झाले आहेत. यामध्ये ५,२३३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. विशेषतः समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि कोकणातील महामार्गांवर अपघातांची संख्या मोठी असून दुर्गम भागात वेळेवर मदत न पोहोचल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
सल्लागाराची नियुक्ती करणार
परिवहन विभागाने या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी आणि व्यवहार्यता तपासण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी २९ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.
भाडेतत्त्वावर सेवा
हेलिकॉप्टर खरेदी करण्याऐवजी ती भाडेतत्त्वावर घेण्याचा सरकारचा मानस आहे. याचा खर्च राज्य आणि केंद्र सरकारच्या 'रस्ते सुरक्षा निधी'तून (रोड सेफ्टी फंड) केला जाणार आहे.
पीपीपी मॉडेल
ही संपूर्ण सेवा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालवण्याचा विचार सध्या सुरू आहे.
उच्चाधिकार समितीने या प्रस्तावावर आरोग्य विभागाकडून अधिक सविस्तर माहिती मागवली असून, पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. जर हा प्रकल्प मार्गी लागला, तर महाराष्ट्रातील अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी एक मोठी आणि जीवनरक्षक यंत्रणा कार्यान्वित होऊ शकेल.प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री