मुंबई : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांची योग्य वेळी कर्जमाफी करू. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले.
अजित पवार म्हणाले की, वीजबिल माफ करून बळीराजाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने वीस हजार कोटींचा भार घेतला आहे, तर ४५ हजार कोटींचा भार लाडक्या बहिणीच्या निमित्ताने उचललेला आहे. शेतकऱ्यांच्या घरातीलच आमच्या बहिणींनादेखील या माध्यमातून मदत होत आहे.
मुख्यमंत्र्यांनीही दिले होते आश्वासन
योग्य वेळेला कर्जमाफी करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याआधी सांगितले आहे. हळूहळू सरकारकडून त्याची तयारी केली जात असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील म्हटले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफीचे शिवधनुष्य उचलण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.