छत्रपती संभाजीनगर : शेतातील विहिरीतून मोटारपंप बसवताना अचानक विहीर खचून झालेल्या दुर्घटनेत वडिलांसह २ मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात घडली आहे. एका क्षणात कुटुंबातील ३ कर्ते पुरुष गेल्यामुळे काकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सिल्लोडच्या धानोरा गावात शनिवारी रात्री ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. बाजीराव सर्जेराव काकडे, आजिनाथ बाजीराव काकडे व श्याम बाजीराव काकडे अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास शेतातील विहिरीत उतरून मोटार पंप बसवण्याचे काम करत होते. यावेळी अचानक विहीर खचली व तिचे कठडे या तिघांच्या अंगावर कोसळले. त्यात हे तिघेही विहिरीत गाडले गेले. कुणाच्याही काहीएक लक्षात येण्यापूर्वीच ही घटना घडली. त्यामुळे कुणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.
विहीर खचल्यानंतर घटनास्थळी एक मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून गावकऱ्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पण काकडे पिता-पुत्रांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढेपर्यंत त्या तिघांचाही मृत्यू झाला होता.