मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आतंकवादासाठी ‘भगवा’ शब्द वापरू नये, त्याऐवजी ‘सनातनी आतंकवाद’ म्हणा, असे विधान केले होते. सनातन संस्थेला दहशतवादी संबोधल्याने सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाण यांना दहा कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे. तसेच बिनशर्त माफी मागण्याची मागणीही केली.
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी सात आरोपींची ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यानंतर काँग्रेसने ‘भगवा दहशतवाद’ म्हणत हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘भगवा’ हा महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेसाठी पवित्र शब्द आहे. हा शिवछत्रपतींच्या ध्वजाचा रंग आहे, तो आतंकवादाला जोडू नका, त्याऐवजी ‘सनातनी आतंकवाद’ म्हणा, असे म्हटले होते.
सनातन संस्थेला 'दहशतवादी' संबोधल्यामुळे सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाण यांना दहा कोटींची मानहानीची नोटीस पाठवली आहे. पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य खोटे, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे संस्थेने म्हटले आहे. सनातन संस्थेची बिनशर्त माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही या नोटिसीतून देण्यात आला आहे. सनातन संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्यावतीने ही मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.
नोटिशीत काय म्हटले?
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतिमा मलीन झाली असून हजारो साधकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येणार असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ दिवसांच्या आत लेखी माफी मागणे, मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने ती माफी प्रसिद्ध करणे, भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने न करणे आणि १० हजार रुपये कायदेशीर खर्च भरपाई देणे, अशा मागण्या या नोटिशीत करण्यात आल्या आहेत.