पुणे : जेजुरीजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तीन वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. जखमींवर तातडीने आणि सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. "घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्वरित घटनास्थळी रवाना झाले असून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत", असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दिंडीतील वारकऱ्यांना ट्रकची धडक
सोमवारी पहाटे सासवड-जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा परिसरात दिंडीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.
मृतांची ओळख पटली
या दुर्घटनेत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवळापूर येथील नंदा पवार (७०), मालगाव येथील माधवी राजाराम सालगरे (५५) आणि कसबे डिग्रज येथील राजश्री शंकर भोसले (५५) यांचा मृत्यू झाला.
औषधामुळे झोप आल्याचा संशय
अपघातग्रस्त ट्रकचा चालक बालाजी एकनाथ डाक (रा. नांदेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात चालकाने वाहन चालवण्यापूर्वी तापावरील औषध घेतल्याचे समोर आले आहे. त्या औषधामुळे त्याला झोप आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक वारकऱ्यांच्या समूहावर गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तपास सुरू
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.