जालना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या दबावामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, असा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी येथे केला.
सरकारने १३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर २० जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. आपण दिलेली १३ जुलैची मुदत संपली आहे. तरीही सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू नये, यासाठी फडणवीस आणि भुजबळ दबाव आणत आहेत असे वाटते, असेही जरांगे म्हणाले. राज्यातील मंत्री शंभूराज देसाई हे मराठा सब-कोटा समितीचे सदस्य असून त्यांनी अद्याप आपल्याशी संपर्क साधलेला नाही. आमचा देसाई यांच्यावर विश्वास आहे, मात्र त्यांनी अद्याप संपर्क साधलेला नाही. कदाचित त्यांच्यावरही दबाव असेल, असेही जरांगे म्हणाले.
भुजबळ ओबीसींना चिथावणी देत आहेत
मराठा नेत्यांच्या बैठकीबाबत २० जुलै रोजी निर्णय होईल आणि विधानसभेत २८८ उमेदवार उभे करावयाचे की मुंबईत नव्याने निषेध मोर्चा काढावयाचा याचा निर्णय २० जुलै रोजी घेण्यात येईल. आमच्या हक्कासाठी आम्हाला मुंबईत जावे लागेल. मराठा आरक्षणाविरुद्ध भुजबळ इतर मागासवर्गीयांना चिथावणी देत आहेत, असेही जरांगे म्हणाले.