छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून ५ ठार प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून ५ ठार

दीर्घ काळाच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचे पुनरागमन झाले असतानाच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून शेतकरी दांपत्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : दीर्घ काळाच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचे पुनरागमन झाले असतानाच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून शेतकरी दांपत्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. वाहूलखेडा येथे पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या लोकांवर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत हमिदा सय्यद (४०), तस्लीम सय्यद (३९) आणि अल्मिरा सय्यद (१७) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर हाफिज सय्यद (२५), अनिसा सय्यद (३८) आणि फरजाना सय्यद (२५) हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दहीगाव येथे मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झोपडीत आश्रय घेतलेल्या शेतकरी दांपत्याचा वीज पडून मृत्यू झाला. मनोहर दुधे (६०) आणि त्यांच्या पत्नी पारवताबाई दुधे अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत त्यांचा मुलगा पंढरीनाथ दुधे जखमी झाला आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, गुरुवारी मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमधील ३१ महसूल मंडळांमध्ये एकाच दिवसात ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यातील झरी महसूल मंडळात सर्वाधिक १२६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा मंडळात ११२.५ मिमी आणि परभणीतील पेडगाव येथे १११.५ मिमी पाऊस झाला.

३७.३ टक्के तुटवडा

दीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सरासरी ५.४ मिमी ते ४१.८ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात मान्सूनच्या काळात (जून ते सप्टेंबर) सरासरी ६७९.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, आतापर्यंत या भागात केवळ ४२३.३ मिमी (६२.३ टक्के) पाऊस झाला असून अजूनही ३७.३ टक्के पावसाचा तुटवडा आहे. बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतील ३१ महसूल मंडळांमध्ये एकाच दिवसात मुसळधार (६५ मिमीपेक्षा जास्त) पाऊस झाला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ऑस्कर स्पर्धेत मराठीचा ‘गोंधळ’; भारतातर्फे अधिकृत प्रवेशिकेसाठी निवड

Mumbai : १३६ फेरीवाल्यांवर कारवाई; दहिसरमध्ये पादचारी प्रथम अभियानाला वेग

दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

केंद्राच्या मदतीसाठी न थांबता मदत करू; दुष्काळी स्थितीबाबत फडणवीसांचा खुलासा

दोन गटांना दोन नावे,दोन चिन्हे; तृणमूल काँग्रेसमधील वादाबाबत निवडणूक आयोगाचा फैसला, ‘लोकशाहीतील काळा दिवस’