संग्रहित छायाचित्र पीटीआय
महाराष्ट्र

गँगस्टर पलांडेचा उज्ज्वल निकमांना सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यास विरोध; भाजपकडून निवडणूक लढवल्याने आक्षेप

Swapnil S

मुंबई : आपल्यावरील खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास कुख्यात गुंड व विविध हत्याकांडातील आरोपी विजय पलांडे याने विरोध केला आहे. यासाठी पलांडेने सोमवारी न्यायालयात धाव घेत भाजपकडून निवडणूक लढवलेल्या निकम यांना माझ्या खटल्यातून काढून टाका, अशी मागणी केली आहे. उज्ज्वल निकम यांची माझ्या खटल्यातील नियुक्ती दुर्भावनापूर्ण व चुकीच्या हेतूने करण्यात आल्याचा दावाही त्याने केला आहे.

एप्रिल २०१२ पासून विजय पलांडे हा न्यायालयीन कोठडीत आहे. पलांडे याच्याविरुद्ध असलेल्या हत्याप्रकरणीच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, पलांडे याने त्यांच्या नियुक्तीवर आता आक्षेप घेतला आहे. उज्ज्वल निकम यांनी मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा १६,००० हून अधिक मतांनी पराभव केला.

उज्ज्वल निकम नुकतेच विजय पलांडे याच्याविरुद्धच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून कोर्टात हजर झाले होते. त्यास पलांडे याने आक्षेप घेत न्यायालयाचे दार ठोठावले आहे. राजकीय अजेंड्यासाठी हाय-प्रोफाइल केसेसमध्ये खोट्या शिक्षा मिळवून देण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. ही गोष्ट आरोपींच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असून, ते या माध्यमातून जनतेमध्ये भाजपची प्रतिमा निर्मिती करतील, अशी भीती विजय पलांडेने आपल्या याचिकेत व्यक्त केली आहे.

सध्या उज्ज्वल निकम यांची ओळख, विचार, अजेंडा, हेतू, उद्देश आदी सर्व काही बदलले आहे. आता ते भाजपचे बडे नेते झाले आहेत, असे पलांडेने आपल्या याचिकेत म्हटले आहे.

२८ जूनला होणार सुनावणी

निकम यांची नियुक्ती रद्द करण्याचे निर्देश संबंधित प्राधिकरणाला द्यावेत, अशी विनंती करणाऱ्या पलांडेच्या या याचिकेवर २८ जूनला सुनावणी होणार आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था