"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन (Photo-X/@CMOMaharashtra)
महाराष्ट्र

"६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा, अनावश्यक प्रवास टाळा"; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

या काळात राज्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, नव्याने उभारलेल्या पायाभूत सुविधांमधील आढळणाऱ्या त्रुटीही तातडीने दूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) तसेच पुणे-नाशिक जिल्ह्यांत ६ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि अतिवृष्टीची शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अधिकृत हवामान इशाऱ्यांचे काटेकोर पालन करण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. या काळात राज्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून, नव्याने उभारलेल्या पायाभूत सुविधांमधील आढळणाऱ्या त्रुटीही तातडीने दूर करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे-नाशिक पट्ट्यात ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह पावसाचा जोर आणि सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नियमित हवामान इशारे जारी करण्यात येत असून, नागरिकांना दर तीन तासांनी एसएमएसद्वारे सूचना पाठवल्या जात आहेत. तसेच विविध माध्यमांतूनही सतर्कतेचे संदेश प्रसारित केले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

'अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळा'

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शक्य असल्यास नागरिकांनी प्रवास टाळावा. अधिकृत हवामान इशाऱ्यांचे पालन करूनच घराबाहेर पडावे."

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

कनेक्टिंग लिंकवरील त्रुटी दूर करणार

नव्याने बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंक मार्गावरील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "तेथे केवळ दोन ठिकाणी खड्डे आढळले आहेत. कामाच्या प्रक्रियेची माहिती न घेता काहीजण प्रत्येक बाबीचा विपर्यास करत आहेत."

विरोधकांच्या टीकेवर बोलताना फडणवीस म्हणाले, "आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करणे हे विरोधकांचे काम आहे. आम्ही देशातील काही सर्वात मोठे पूल आणि बोगदे उभारले आहेत. काही ठिकाणी तक्रारी समोर आल्या असतील, तर त्या निश्चितच दूर केल्या जातील."

पहिला पावसाळा म्हणजे गुणवत्ता चाचणीचा टप्पा

नवीन रस्ते आणि उड्डाणपुलांची टिकाऊपणा तपासण्यासाठी पहिला पावसाळा महत्त्वाचा असतो, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाळ्यानंतर अंतिम थराचे काम केले जाते. या काळात काही त्रुटी आढळल्यास त्या ओळखून तातडीने दुरुस्त केल्या जातात.

"नवीन उड्डाणपुलांवर टाकण्यात येणारे मॅस्टिक डांबर सुरुवातीला स्थिरावते आणि त्यानंतर अपेक्षित कार्यक्षमतेने काम करते. नव्याने उभारलेल्या पायाभूत सुविधांनाही स्थिर होण्यासाठी काही कालावधी लागतो," असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावरील तक्रारींचीही दखल

सरकारवर करण्यात येणारी विधायक टीका स्वीकारार्ह असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, सोशल मीडियासह कोणत्याही माध्यमातून समोर आलेल्या वास्तविक त्रुटींची तपासणी करून त्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल.

मुंबईत रेड अलर्ट

भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मुंबईतील अनेक भागांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

बीएमसीच्या आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी ८.३० ते दुपारी १.३० या कालावधीत ठाणे शहरात ६५.७९ मिमी पाऊस झाला असून, यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान ८२९.८४ मिमी इतके झाले आहे. त्याच कालावधीत पालघर जिल्ह्यात ९७.७० मिमी पावसाची नोंद झाली असून, हंगामातील एकूण पर्जन्यमान ६४३.१० मिमी इतके झाले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : पावसाचा जोर कायम; मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

जोगेश्वरीत भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी केलं पोलिसांच्या हवाली, Video

केंद्राची मोठी कारवाई; यूएपीए अंतर्गत पाकिस्तानातील २३ जण दहशतवादी घोषित