कोल्हापूर : मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात शाहूवाडी तालुक्यातील पाटणे इथल्या विलास पाटील हे जखमी झाले होते. चार डिसेंबर रोजी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या अतिदक्षता विभागात रात्री ८ वाजता अत्यवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. सुरुवातीला जखमी पाटील यांच्या शरीरावर सर्वत्र सूज होती, नंतर काही दिवसातच त्यांना मूत्र विसर्जन कमी प्रमाणात होऊ लागले. या अनुषंगाने त्यांची तपासणी केली. सुरुवातीस सामान्य असलेले सिरम क्रिएटिनिन काही दिवसातच झपाट्याने वाढून ९ पूर्णाक २ पर्यंत पोहोचले. यामध्ये रुग्णाच्या जीवित्तास धोका असल्यानं तात्काळ डायलेसिस उपचार पद्धतीचा वापर सुरू करण्यात आला. प्रथम तीन दिवस सलग आणि त्यानंतर एक दिवसाआड चार वेळा असे एकूण सात वेळा डायलेसिस करून रुग्णाची किडनी यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आली.
सद्या विलास पाटील यांचे सिरम क्रिएटिनिन १ पूर्णाक ४ वर पोहोचले असून पाटील यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून पुनर्जन्म मिळवून देण्याचे काम सीपीआरमधील डॉक्टरांच्या टीमने केल्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस. एस. मोरे यांनी सांगितले.
पाटील यांच्यावरील उपचार पद्धतीला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला.
मात्र छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभाग क्रमांक तीनचे प्रमुख डॉ. बुद्धीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मंगेश शिंदे, डॉ. सागर बडवाईक, डॉ. रेणुका माटे, डॉ. सचिन गोदारा, डॉ. सौरभ डोंगरे, डॉ. आदित्य लांडे यांनी उपचारासाठी विशेष परिश्रम घेतले.