कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील प्रसिद्ध माधुरी हत्तीण तब्बल १३ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी आपल्या मूळ घरी परतली. यावेळी हजारो भाविक आणि स्थानिक ग्रामस्थांनी तिचे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत आणि फुलांची उधळण करून अत्यंत भावूक वातावरणात जल्लोषात स्वागत केले.
माधुरी गेल्या १३ महिन्यांपासून गुजरातमधील जामनगर येथील वनतारा पुनर्वसन केंद्रात होती. न्यायालयीन प्रक्रिया आणि उच्चस्तरीय समितीच्या आदेशानंतर तिला पुन्हा नांदणी मठात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार वनताराची विशेष टीम आणि वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान कार्णिक हे स्वतः माधुरीला घेऊन कोल्हापूरमध्ये दाखल झाले.
माधुरीचे आगमन होताच नंदणी आणि परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ग्रामस्थांनी तिच्यावर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव केला. मठाच्या परिसरात तिच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच, माधुरीच्या सुरक्षित वापसीसाठी सहकार्य केल्याबद्दल अनंत अंबानी यांचे आभार मानणारे होर्डिंग्जही नंदणी परिसरात ठिकठिकाणी लावले गेले होते.