महाराष्ट्र

महाविकास आघाडीचे आता ‘मिशन ईव्हीएम’

विधानसभा निवडणुकीत महायुतीविरोधात जनतेचा रोष असतानाही महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे महायुतीच्या घवघवीत यशाबद्दल आता ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट आता ईव्हीएमविरोधात जनआंदोलन उभारणार आहे.

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीविरोधात जनतेचा रोष असतानाही महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे महायुतीच्या घवघवीत यशाबद्दल आता ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट आता ईव्हीएमविरोधात जनआंदोलन उभारणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी राज्यभरातील पराभूत उमेदवारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये ईव्हीएमसंदर्भातील माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी वकिलांची एक फौज उभी करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनेदेखील राज्यभरातील पराभूत उमेदवारांची एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत देखील ईव्हीएम मशीनच्या आकडेवारीबद्दल आपापल्या मतदारसंघातून माहिती मिळविण्याचे आदेश पराभूत उमेदवारांना देण्यात आले आहे. आगामी काळात ईव्हीएम मशीनविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात जनआंदोलन उभे करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही माहिती महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.

विरोधी पक्षांच्या माध्यमातून ईव्हीएमविरुद्ध जनआंदोलन उभारणार असल्याचे राष्ट्रवादी (शप) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, “काही बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातही मतदानात फेरफार झाले. आपल्याला ईव्हीएमविरोधात लढावे लागेल, हे मी आधीच सांगितले आहे. रशियात व्लादिमिर पुतिनने आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपवून टाकले, तसे आपल्याकडेही होऊ शकते. विरोधकांना व्यवस्थितरीत्या संपवून टाकायचे, हा प्लॅन दिसत आहे. आता चार महिन्यांपूर्वी दोन लाख ४० हजार मतांनी चंद्रपूरची जागा निवडून येते आणि आता एक लाखांनी पाठी जाते? मग एवढे काय घडले? नांदेडची लोकसभा महाविकास आघाडीला येते, पण सर्व विधानसभा तिकडे जातात. याचा अर्थ जिल्ह्याजिल्ह्यात पॅटर्न दिला आहे. एवढी मते आणि एवढ्या जागा अशा पद्धतीचा पॅटर्न दिला,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार