मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत अंतिम टप्प्यात पोहचूनही अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारकडून खासगी नोकरीचीसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) 'प्रतिभा सेतू'च्या धर्तीवर राज्य सरकारने 'एमपीएससी' साठी 'निपूण सेतू उपक्रम सुरू केला असून या उपक्रमामुळे उमेदवारांना खासगी नोकरीची दारे खुली होणार आहेत. यासाठी संबंधित नियोक्ते तसेच उद्योजकांसाठी अशा उमेदवारांची नामावली उपलब्ध केली जाणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार निपूण सेतू संदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी राज्य सरकारकडून जारी केला. एमपीएससी परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने उमेदवार पात्र ठरत असले तरी उपलब्ध पदसंख्या मर्यादित असल्यामुळे अंतिम निवडीसाठी काही उमेदवारांचीच शिफारस केली जाते. परिणामी, अनेक गुणवंत आणि सक्षम उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता, स्पर्धात्मक परीक्षांमधून विकसित झालेली विश्लेषणक्षमता, नेतृत्वगुण तसेच सार्वजनिक सेवा करण्याची मानसिकता असूनही त्यांना अपेक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत.
या दृष्टीने उमेदवारांचे तपशील सार्वजनिक तसेच विशेषतः महाराष्ट्रातील खासगी क्षेत्रातील संभाव्य नियोक्त्यांना आणि उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागामार्फत विकसित केलेल्या एक खिडकी 'मैत्री २.०' पोर्टल अंतर्गत 'निपुण सेतू' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. याअंतर्गत एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या, परंतु अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या सर्व उमेदवारांसाठी हा उपक्रम लागू असेल. अंतिम टप्प्यातील उमेदवारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संमतीपत्र प्राप्त झाल्यास आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास, अशा उमेदवारांची माहिती या पोर्टलवर समाविष्ट करण्यात येईल.
खासगी उद्योजक, कॉर्पोरेट्स आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना योग्य मनुष्यबळ निवडता येण्यासाठी उमेदवारांचे तपशील संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यात उमेदवाराच्या नावापासून शैक्षणिक तपशील तसेच अन्य माहिती उपलब्ध केली जाईल. संबंधित उमेदवाराची अन्य कोणत्याही ठिकाणी किंवा परीक्षेत निवड झाल्यास त्याचे नाव या संकेतस्थळावरून वगळले जाणार आहे.