कराड : राज्यात एकच ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील पैलवानांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ४० महाराष्ट्र केसरी, १० हिंदकेसरी आणि सुमारे दोन हजार पैलवानांनी बुधवारी कराड येथून मुंबईकडे ‘आक्रोश मोर्चा’ काढत प्रस्थान केले.
भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर दिवंगत कुस्तीपटू पैलवान खाशाबा जाधव यांच्या कराड (कार्वे नाका) येथील स्मृतिस्तंभास अभिवादन करून सकाळी ११ वाजता या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. मानाच्या गदांसह पैलवानांनी मोर्चात सहभाग घेत राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या मोर्चात डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर, सांगलीचे महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी नामदेव मुळे, साताऱ्याचे महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नामांकित पैलवान उपस्थित होते. दरम्यान, या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून पैलवानांनी राज्य शासनाकडे एकच ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा घेण्याची मागणी पुन्हा जोरकसपणे मांडली आहे.
गेल्या साठ वर्षांपासून ‘महाराष्ट्र केसरी’ पदासाठी कुस्ती स्पर्धेची एकच परंपरा राज्यात सुरू आहे. ही परंपरा अखंडित सुरू राहावी, अशी पैलवानांची अपेक्षा होती. मात्र यंदा राज्यात तब्बल चार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ते पुढे म्हणाले, हा प्रकार तातडीने थांबवला पाहिजे.चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान