मुंबई : हवामानातील सततच्या बदलांमुळे गेल्या काही दिवसांपासून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास लांबला आहे. राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. मात्र, त्यानंतर पावसाच्या परतीचा प्रवास खोळंबला होता. आता पुढील एक-दोन दिवसांत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून मोसमी वारे माघारी परतणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.
यंदा नैऋत्य मोसमी पाऊस अंदाजित वेळेआधीच म्हणजे २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मोसमी पावसाने नेहमीच्या वेळेपेक्षा सुमारे दोन आठवडे आधीच महाराष्ट्राची सीमा ओलांडली. याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. त्यानंतर जून, जुलै या दोन महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर १४ सप्टेंबरपासून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली. आणखी काही भागांमधून मोसमी वाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला.
महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल, अशी शक्यता होती. मात्र, बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, तसेच ‘शक्ती’ चक्रीवादळ यामुळे मोसमी पावसाचा परतीचा प्रवास लांबला. त्यामुळे गेल्या १० ते १२ दिवसांपासून पावसाचा परतीचा प्रवास खोळंबला आहे. मात्र, आता पुढील एक - दोन दिवसांत राज्यातून मोसमी पाऊस परतीचा प्रवास सुरू करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवेतील उकाड्यात वाढ
गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. मुंबईसह इतर भागात दिवसभर असह्य उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३२.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रुझ केंद्रात ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.