मुंबई : राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने पात्र शिधापत्रिकाधारकांना क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ ऑगस्टपासून नंदूरबार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्मार्ट शिधापत्रिकेचा पथदर्शी प्रकल्प राबवला जाईल. त्यामुळे नजीकच्या काळात कागदी शिधापत्रिका इतिहासजमा होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विभागाने पहिल्या टप्प्यात प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठी स्मार्ट शिधापत्रिका तयार केल्या आहेत. येत्या १५ ऑगस्टपासून ते २६ जानेवारी २०२७ दरम्यान नंदुरबार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या शिधापत्रिकांचे वितरण होईल. या वितरण मोहिमेला ‘स्वर्गीय अजितदादा पवार लोककल्याण स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहीम’ असे नाव देण्यात आले आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या स्मार्ट शिधापत्रिकांच्या प्रतिकृतीचे अनावरण केले.
धान्याची माहिती मिळणार
स्मार्ट शिधापत्रिकेवरील शिधावाटप दुकानातील धान्य कुठून आले, याची माहिती लाभार्थी धान्याच्या गोणीवरील क्यूआर कोड स्कॅन करून घेऊ शकतो. मिळालेले धान्य खराब असेल किंवा त्याचा दर्जा योग्य नसेल तर लाभार्थीला धान्य परत करता येईल, तसेच त्याची तक्रारसुद्धा नोंदवता येईल.
स्मार्ट शिधापत्रिका
प्रत्येक स्मार्ट शिधापत्रिकेला विशिष्ट क्रमांक दिला जाईल
स्मार्ट शिधापत्रिका आधारकार्डशी जोडलेली असेल
शिधापत्रिकेवर प्रत्येक लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद
अन्नधान्य मिळताच लाभार्थ्यांला मोबाईलवर संदेश मिळणार