राज्यातील वातावरण पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे दिसत असून, हवामान खात्याने ३० मार्च ते ४ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा दिला आहे. या कालावधीत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट, जोरदार वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
कोणत्या भागांना बसणार फटका?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक परिणाम जाणवू शकतो. ३० मार्चपासून दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो.
३१ मार्चला थोडा दिलासा, पण अस्थिरता कायम
३१ मार्च रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली, तरी वातावरण पूर्णपणे स्थिर राहणार नाही. काही भागांत हलका वादळी पाऊस सुरू राहू शकतो.
१ ते ४ एप्रिलदरम्यान पुन्हा पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाच्या माहितीनुसार, १ ते ४ एप्रिलदरम्यान पुन्हा वादळी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना
सध्या रब्बी पिकांची कापणी सुरू असल्याने शेतकऱ्यांना विशेष इशारा देण्यात आला आहे. कापणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. जोरदार वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच आवश्यक ती खबरदारी घेऊन नुकसान टाळण्याचा प्रयत्न करावा.
वादळी पावसात नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाच्या वेळी झाडाखाली, टिनच्या शेडखाली तसेच वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा वीजवाहिन्यांच्या जवळ थांबू नये, असे प्रशासनाने नागरिकांना सांगितले आहे.
मुंबईत पावसाची शक्यता किती?
प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, ३० मार्च रोजी मुंबईत हलक्या सरी आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याचा पुढील अंदाज
एप्रिल महिन्यात मुंबईतील पावसाबाबत अद्याप स्पष्ट अंदाज देण्यात आलेला नाही. मात्र, राज्यभरात पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.