नांदेड: मनोज जरांगेंची शांतता रॅली नांदेडमध्ये दाखल झाली आहे. मनोज जरांगेंवर यावेळी मराठा समाजातील बांधवांकडून जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. मराठा समाज आणि ओबीसींमध्ये भुजबळ वाद लावत आहेत, असा आरोप मनोज जरांगेंनी केला. आरक्षण न दिल्यास २८८ उमेदवार उभे करायचे की पाडायचे, हे आम्ही ठरवू, असा इशाराही मनोज जरांगेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
'हा' डाव सरकारनं टाकलाय...
मनोज जरांगे म्हणाले की, "हे माझं स्वागत नाहीये, हा मराठ्यांचा आक्रोश आहे. सरकारनं मला बदनाम करून बाजूला करण्याचं काम केलं. मला उघडं पाडण्यासाठी ओबीसींची फौज सरकारनं तयार केली. आमच्या विरोधात, मराठ्यांच्या विरोधात दंगली व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. आता मराठ्यांना असं वाटतंय की, हा डाव सरकारनं टाकलाय, त्यात आपल्या लेकराला साथ द्यायची आहे. मनोज जरांगेंना एकाट्याला उघडं पडून द्यायचं नाही. म्हणून माझा समाज स्वतःच्या लेकरासाठी ताकदीनं रस्त्यावर आलाय. "
फडणवीस साहेब,आता डाव टाकू नका-
जरांगे पाटील पुढं म्हणाले की, "माझा मराठा समाज मला याच गोष्टीमुळं मानतो की, कोणताही नेता आला आणि काहीही झालं, तरी हा मनोज जरांगे कोणाचाच नाही. आता मुंबईला तर जाणार नाही, पण गेलो तर यावेळी मराठा घरीच राहणार नाही. फडणवीस साहेबांना सांगतो, आता तुम्ही डाव टाकू नका. १३ तारखेपर्यंत विश्वास ठेवलाय. शंभुराजे साहेब आम्हाला आरक्षण देतील अशी आशा आहे. आम्हाला अपेक्षासुद्धा आहे आणि विश्वासपण आहे. नाही दिलं तर २८८ उभे करायचे, की पाडायचे हे आम्ही ठरवणार आहे."