नवी मुंबई : मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्याहून पिकअप टेम्पो घेऊन मुंबईत जाणाऱ्या मराठा बांधवांना ८ ते १० जणांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी पनवेलमध्ये घडली. या मारहाणीत ५ मराठा बांधव जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी मराठा बांधवांना मारहाण करणाऱ्या ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यापैकी पाच आरोपींना अटक केली आहे. तसेच इतर मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे शुक्रवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत. रविवारी दुपारी पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील काही मराठा बांधव पिकअप वाहनाने जुन्या मुंबई–पुणे मुंबई रोडने मुंबईच्या दिशेने जात होते. मराठा बांधवाची पीकअप सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास पनवेल मधील डेरवली ब्रिजच्या जवळ आली असताना, रहदारीच्या ओघात पुढे चालत असलेल्या लाल रंगाच्या कारला (क. एम एच ४६ बीए २०३२) पीकअप वाहन घासली गेली.
यावरून कार चालक आणि मराठा बांधवांमध्ये वाद होऊन भांडण झाले, त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. या गोष्टीचा राग मनात राग धरून कार चालकाने पुष्पक नगर समोरील पहिल्या ब्रिजजवळ मराठा बांधवांचे पीकअप वाहन अडवले. त्यानंतर आरोपी कार चालक व त्याच्या ८ ते १० साथीदारांनी चंद्रकांत बाबाजी थोरांधळे, शाम बबन केमगीरे, गणेश ज्ञानेश्वर मिंडे, रामदास पिंगळे, सुधाकर ढवळे या मराठा बांधवांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. या घटनेनंतर सर्व हल्लेखोरांनी पलायन केले.