रायगड : म्हसळा नगरपंचायतीत पक्षादेशाचे उल्लंघन करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेल्या सात नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर शिंदे गटाची राजकीय समीकरणे कोलमडल्याची चर्चा असून, जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
काही महिन्यांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी एकत्रितपणे पक्षांतर करून शिंदे गटात प्रवेश केला होता. या घटनेमुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्याबळाला मोठा फटका बसला होता. या पक्षांतराविरोधात खासदार सुनील तटकरे यांनी आक्रमक भूमिका घेत पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची मागणी केली होती. त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी अलिबाग येथे सविस्तर सुनावणी पार पडली. सर्व बाजूंचा विचार करून संबंधित नगरसेवकांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा निर्णय
या निर्णयामुळे म्हसळा नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे बदलली असून राष्ट्रवादी काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत झाल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून तटकरे यांच्या रणनीतीचे कौतुक केले जात आहे. दुसरीकडे, मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) साठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे. म्हसळा तालुक्यात उभे राहिलेले शिंदे गटाचे बळ कमी झाल्याने आगामी निवडणुकांमध्ये या निर्णयाचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
अपात्र ठरविण्यात आलेले नगरसेवक
कमल रवींद्र जाधव, मेहजबिन नदीम दळवी,असलम असलम कादरी, फरहीन अजीज बशारत,सुमैया कासम आमदानी, सारा अब्दुल कादिर म्हसलाई, शाहिद सईद जंजिरकर यांचा समावेश आहे.