शिमग्याला गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी गुड न्यूज! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी १ मार्चपासून; पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर 
महाराष्ट्र

शिमग्याला गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी गुड न्यूज! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी १ मार्चपासून; पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर

शिमगा आणि होळीपूर्वी चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा १ मार्चपासून सुरू होत आहे. समुद्रमार्गे प्रवासी आणि वाहनांसह प्रवास करण्याची सुविधा मिळणार असल्याने कोकणात जाणं अधिक सोपं होणार आहे.

Mayuri Gawade

शिमगा आला की कोकणकरांची धाव गावीच असते. पण याच काळात ट्रेन-बसचे आरक्षण मिळणं कठीण, रस्त्यांवर प्रचंड गर्दी आणि तासन्‌तासांचा प्रवास… त्यामुळे गावी जाणं त्रासदायक ठरतं. यंदा मात्र शिमगा आणि होळीपूर्वी एक दिलासादायक पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा १ मार्चपासून सुरू होत आहे. समुद्रमार्गे प्रवासी आणि वाहनांसह प्रवास करण्याची सुविधा मिळणार असल्याने कोकणात जाणं अधिक सोपं होणार आहे.

या सेवेचा शुभारंभ सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पहिले तिकीट बुक करून केला. ही सेवा एम२एम कंपनीमार्फत चालवली जाणार आहे. कोकण किनारपट्टीवरील प्रवासी जलवाहतूक काही वर्षांपासून बंद होती. जहाज अपघातानंतर सुरक्षा तपासण्या आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता ही सेवा पुन्हा सुरू होत आहे.

कसे असेल वेळापत्रक?

१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मुंबई बंदरातून पहिली फेरी सुटेल आणि दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल.
परतीची फेरी २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून सुटून सायंकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होईल.

मार्च महिन्यात एकूण १६ फेऱ्या नियोजित आहेत.

  • मुंबई ते विजयदुर्ग: १, ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मार्च

  • विजयदुर्ग ते मुंबई: २, ५, ८, १२, १५, १९, २२, २६ मार्च

प्रारंभीच्या टप्प्यात प्रवाशांचा प्रतिसाद आणि सेवेची कार्यक्षमता (ऑपरेशनल फिजिबिलिटी) तपासण्यासाठी हे टप्प्याटप्प्याने वेळापत्रक आखण्यात आले आहे. प्रतिसाद समाधानकारक मिळाल्यास भविष्यात फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो.

तिकीट दर किती?

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेचे प्रस्तावित दर पुढीलप्रमाणे :

  • इकॉनॉमी: २,५०० रु.

  • प्रीमियम इकॉनॉमी: ४,००० रु.

  • दुचाकी: १,००० रु.

  • सायकल: ६०० रु.

  • चारचाकी: ६,००० रु.

ही फेरी प्रवाशांसह वाहनांची वाहतूक करणार असल्याने स्वतःची गाडी घेऊन कोकणात जाणं अधिक सोपं होणार आहे. रस्त्याने १०-१२ तासांचा प्रवास करण्याऐवजी समुद्रमार्गे निसर्गरम्य आणि तुलनेने आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, या सेवेच्या पुनरारंभामुळे कोकण पर्यटनाला मोठी चालना मिळेल. तसेच स्थानिक व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेलाही फायदा होण्याची अपेक्षा आहे. शिमग्याच्या काळात गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी ही सेवा विशेष आकर्षण ठरू शकते.

आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास; मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा; MMRDA च्या अर्थसंकल्पात समावेश

Mumbai : मोनोरेल पुन्हा धावणार! सीसीटीव्ही, चार्जिंग पॉइंट्स, स्मार्ट सिग्नलिंग अशा २१ नव्या सुविधांसह सज्ज; MMRDA ची घोषणा

महामार्गावर टोलवसुली होणार कॅशलेस; १ एप्रिलपासून अंमलबजावणीचे संकेत

BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला

सोमवारपासून राज्याचे अधिवेशन; दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेत्याची प्रतीक्षा