महाविकास आघाडीत कलगीतुरा; ठाकरे गटाच्या टीकेला काँग्रेसचे सडेतोड प्रत्युत्तर 
महाराष्ट्र

महाविकास आघाडीत कलगीतुरा; ठाकरे गटाच्या टीकेला काँग्रेसचे सडेतोड प्रत्युत्तर

काँग्रेस प्रादेशिक पक्षांना 'कुबड्या' म्हणून वापरते आणि त्यांना आघाडीत समान स्थान देत नाही, या शिवसेना ठाकरे गटाच्या आरोपावर काँग्रेसने सोमवारी जोरदार पलटवार केला.

Swapnil S

मुंबई : काँग्रेस प्रादेशिक पक्षांना 'कुबड्या' म्हणून वापरते आणि त्यांना आघाडीत समान स्थान देत नाही, या शिवसेना ठाकरे गटाच्या आरोपावर काँग्रेसने सोमवारी जोरदार पलटवार केला.

‘संजय राऊत हे अनेकदा पत्रकार आणि राजकारणी या दोन भूमिकांमध्ये गोंधळलेले असतात. एका पत्रकाराचे काम त्रयस्थपणे उणिवा दाखवणे असते, मात्र राजकीय प्रवक्ते केवळ विरोधकांना लक्ष्य करतात. या दोन्ही भूमिकांची गल्लत केल्यामुळे स्वतःची जबाबदारी विसरली जाते’, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीत प्रत्येक पक्षाची स्वतःची भूमिका असते आणि कोणतीही घोषणा करण्यापूर्वी त्यावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक असते. स्वतःहून निर्णय घ्यायचे आणि नंतर काँग्रेस नेत्यांकडे पाहायचे, ही आघाडी धर्माची पद्धत नाही, असा टोला सावंत यांनी लगावला. यापूर्वी समन्वय आणि संवाद नसल्यामुळेच मुंबई आणि चंद्रपूरसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमधील सत्ता महाविकास आघाडीला गमवावी लागली होती, असा दावाही त्यांनी केला. आम्ही भाजपविरोधात प्रामाणिकपणे लढत असून आम्हाला आरोप-प्रत्यारोपांत रस नाही, मात्र आत्मपरीक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी 'सामना'मधील अग्रलेखावर टीका करताना सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसवर टीका करताना म्हटले होते की, ज्यांना केंद्रात सत्ता स्थापन करायची आहे, त्यांनी प्रादेशिक पक्षांना केवळ कुबड्या न समजता समान वाटा द्यायला हवा. प्रादेशिक पक्षांना सामावून घेणे हा कमकुवतपणा नसून ती राजकीय प्रगल्भता आहे. काँग्रेस जरी राष्ट्रीय पक्ष असला तरी त्यांनी आपण प्रादेशिक पक्षांचा आदर करतो, असा संदेश देणे गरजेचे आहे. राज्यातील राज्यसभा आणि आगामी विधान परिषद निवडणुकीवरून शिवसेनेने ही नाराजी व्यक्त केली होती.

‘उबाठा’ची काँग्रेसवर टीका

राज्यात लोकसभेला मिळालेले यश हे समन्वयामुळेच मिळाले होते, याची आठवण करून देत शिवसेनेने काँग्रेसला जुन्या घडामोडींवरूनही लक्ष्य केले. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अचानक राजीनामा दिला नसता, तर महाविकास आघाडी पुढील १५ वर्षे सत्तेत राहिली असती. केंद्रात राहुल गांधी सर्व पक्षांना समान मानतात, मात्र राज्यातील काँग्रेस नेतृत्वाने ही प्रगल्भता दाखवल्यास ते प्रादेशिक पक्षांसाठी आश्वासक ठरेल, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

हजारो कोटींची टेंडर्स मॅनेज, सर्वांचे कमिशनही 'फिक्स'; नाशिकमधील प्रस्तावित कुंभमेळा टेंडर्स बाबत लाचखोर अधिकाऱ्याचे धक्कादायक दावे 

ठाणेकरांना पाण्याची अजिबात चिंता नको! धरणात पुरेसा पाणीसाठा; महापालिकेची माहिती

एनसीईआरटी पाठ्यपुस्तक वाद; 'त्या' ३ तज्ज्ञांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Nashik : रिक्षावाल्यांनी केला लिंबू-मिरची त्याग; अंनिसच्या परिषदेचा सकारात्मक परिणाम

मतदार यादीत नाव टिकवण्यासाठी आता घरबसल्या पडताळणी; महाराष्ट्रात १ लाख BLO देणार घरोघरी भेटी