मुंबई : ‘जे लोक रेल्वेने जम्मू-काश्मीरला गेले, ज्यांचे खाण्याचे वांदे, त्या लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आले, त्यांनी विमान प्रवास केला’, असे असंवेदनशील वक्तव्य शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केले. नरेश म्हस्के यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्यात परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष विमानाची व्यवस्था केली आहे.
राज्य सरकारबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी पर्यटकांच्या मदतीला धावून आली. मात्र, शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्यांमुळे शिंदे गटाची कोंडी झाली आहे. ‘जे लोक कधीही विमानात बसले नाहीत, त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून आणले’, असे नरेश म्हस्के म्हणाले.
‘ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आमचे पथक काश्मीरला पाठवले. एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी पोहचले आहेत. कोल्हापूर, केरळ आणि इर्शाळवाडी या ठिकाणी एकनाथ शिंदे सर्वात आधी पोहचून मदत करत होते. सरकारही मदत करत आहे. जे लोक कधीही विमानात बसले नव्हते, त्या लोकांना एकनाथ शिंदे यांनी विमानांत बसवून आणले. ४५ लोक रेल्वेने पहलगामला गेले होते. गरीब लोक, त्यांच्या खाण्याचे वांदे होते. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये ते लोक राहत होते. त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानतळावर आणले. ते लोक पहिल्यांदाच विमानात बसले, असेही म्हस्के म्हणाले.
यांना सत्तेचा उन्माद - सुषमा अंधारे
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. प्रत्येक राज्यातून कुणी ना कुणी गेले आहे. अशावेळी भान ठेवले पाहिजे. पण यांना सत्तेचा उन्माद इतका आहे की, त्यांना लोकांच्या भावना समजत नाहीत. त्या लोकांना विमानातून परत आणले म्हणजे उपकार केलेत का? मग तिकडे गेला होता कशाला? फक्त फोटोसेशन करायला गेला होता का?, असा सवाल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.