राज्यात ४४ लाखांवर खटले प्रलंबित; नागरिकांना न्यायासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा 
महाराष्ट्र

राज्यात ४४ लाखांवर खटले प्रलंबित; नागरिकांना न्यायासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा

राज्यातील सामान्य नागरिकांना 'तारीख पे तारीख'च्या कचाट्यात न्यायासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील सामान्य नागरिकांना 'तारीख पे तारीख'च्या कचाट्यात न्यायासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्यातील विविध न्यायालयांमध्ये दिवाणी आणि फौजदारी खटल्यांचा डोंगर सातत्याने वाढत असून प्रलंबित खटल्यांची संख्या ४४ लाखांच्या पुढे गेली आहे. यात ७ लाख २६ हजार फौजदारी, तर ३६ लाख ७७ हजार दिवाणी खटल्यांचा समावेश आहे. खटले दीर्घकाळ रखडत असल्याने सर्वसामान्य पक्षकारांना मानसिक आणि आर्थिक फटका बसत आहे.

प्रलंबित फौजदारी गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांमध्ये किरकोळ वादावादी, चोरी, फसवणुकीपासून ते गंभीर गुन्ह्यांपर्यंतच्या प्रकरणांचा समावेश आहे. दुसरीकडे जमिनीचे वाद, मालमत्ता, कौटुंबिक वाद आणि करारांशी संबंधित दिवाणी दाव्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. दिवाणी दाव्यांचे प्रमाण वाढत असताना त्यांचा वेळीच निपटारा करण्यात राज्यातील न्यायालयीन यंत्रणा तोकडी पडत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यातील न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची मंजूर पदे कमी आहेत, त्यातही अनेक पदे रिक्त आहेत. तसेच तालुका आणि जिल्हा पातळीवरील न्यायालयांमध्ये तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांची अजूनही वानवा आहे.

एका न्यायालयाने निकाल दिल्यानंतर उच्च न्यायालयात होणारे अपिल आणि सुनावणीदरम्यान लागणारा तांत्रिक वेळ यामुळे खटले लांबत असल्याचे चित्र आहे. अनेक खटले ५ वर्षांपासून ते ३० वर्षांपर्यंत रखडल्याचे 'नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीड'च्या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सुविधांअभावी खटल्यांचा निपटारा होण्याचा वेग कमी असल्याने वर्षानुवर्षे प्रलंबित खटल्यांचा डोंगर उभा राहत असल्याचे उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयातील वकिल सांगतात.

उच्च न्यायालयातही हजारो प्रकरणे प्रलंबित

मुंबई उच्च न्यायालयात ऑनलाइन सुनावणी सुरू झाल्यापासून न्यायदानाला गती मिळाली आहे. मात्र प्रलंबित प्रकरणांची संख्या अजूनही हजारोच्या घरात आहे. 'नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीड'च्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, दिवाणी २ लाख ४३ हजार, तर फौजदारी ५१,६७५ प्रकरणे प्रलंबित आहेत. यात १० ते २० वर्षे रखडलेल्या प्रकरणांची संख्या १७,७७८ आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई-सावंतवाडी दरम्यान नवीन एक्स्प्रेस धावणार; चाकरमानी, पर्यटकांची मोठी सोय होणार

...तर पेट्रोल १२५ रुपयांवर पोहोचले असते; इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या धोरणाचे केंद्राने केले समर्थन

तरुणांनी राष्ट्र उभारणीसाठी समर्पित व्हावे; पंतप्रधानांचे आवाहन

डोवाल यांचे धोरण कणखर; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार; लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

Friendship Day 2026 : "मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा"; तुमच्या बेस्ट फ्रेंड्सना पाठवा खास शुभेच्छा संदेश