छत्रपती संभाजीनगर : “अशोक खरात हा काही अपवाद नाही, तर अशा प्रकारचे बाबा हा समाजातील एक ‘नियम’च बनला आहे. स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करून लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणारा प्रत्येक बाबा हा भोंदूच असतो,” अशी परखड टीका अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी केली.
शहरातील परिवर्तनवादी संस्थांच्या वतीने एमजीएम विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहात ‘बुवा तेथे बाया’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाला जयदेव डोळे, अंकुशराव कदम, प्रकाश दाणे, सुभाष महेर, डी. एम. पाटील, धनंजय पाटील, बालाजी जाधव, वैशाली डोळस, मेधा थोरात आणि सुरेश झुरमुरे यांची उपस्थिती होती.
“दैवी शक्तीचा दावा म्हणजे फसवणूक”
प्रा. मानव म्हणाले, “आपल्यात देवाचा संचार आहे, देवाची कृपा आहे किंवा आपण चमत्कार करू शकतो, असा दावा करून लोकांची फसवणूक करणारा प्रत्येक बाबा हा भोंदूच असतो. अशोक खरातने तंत्रपूजा, शुद्धीकरण पूजा आणि विशेष पूजांच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळले, तसेच महिलांचे शोषण केले.” त्यांनी पुढे सांगितले की, “खरातकडे अनेक मोठे राजकीय नेते जात होते. मात्र, कारवाई झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो.
जादूटोणाविरोधी कायद्यानुसार खरातला मदत करणाऱ्या पतसंस्था, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि संबंधित व्यक्तींवरही गुन्हे दाखल होऊ शकतात.”