पुणे : कृषी महाविद्यालयातील मेसमधील जलशुद्धीकरण यंत्रातून विजेचा धक्का बसल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषींवर कारवाई व सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करण्याची मागणी होत आहे.
चैतन्य कुंडलिक चव्हाण (२३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. चैतन्य कृषी महाविद्यालयात ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो ‘ई-मेस’ समितीचा सदस्य होता. १४ मार्च रोजी तो मेसचे कामकाज पाहत असताना जलशुद्धीकरण यंत्र (फिल्टर) व्यवस्थित कार्यरत आहे का, याची पाहणी करत होता. त्यावेळी अचानक यंत्रात वीज प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा विजेचा धक्का बसला आणि तो बेशुद्ध पडला. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.
महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी तसेच संपूर्ण कॅम्पसमध्ये विद्युत सुरक्षेचे लेखापरीक्षण तातडीने करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.