पुणे : पुणे जिल्ह्याला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील पाटण गावावर सोमवारी पाहते निसर्गाचा भीषण प्रकोप झाला. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला. सोमवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण दुर्घटनेत नंदू तिकोणे यांचे घर डोंगरावरून आलेल्या माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडले गेले.
या भीषण दुर्घटनेत तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये नंदू तिकोणे (६०), माऊली तिकोणे (३०) आणि अनिता तिकोणे (५५) यांचा समावेश आहे. कुटुंबातील एका महिलेचा शोध सोमवारी संध्याकाळपर्यंत सुरू होता. प्रशासनाने सुमारे २३ ते ३५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.
स्फोटासारखा आवाज आणि घर गायब
ही भीषण दुर्घटना सोमवारी पहाटे ४ ते ४:३० च्या सुमारास घडली. लोणावळा आणि मावळ परिसरात अतिवृष्टी होत असल्याने विसापूर किल्ल्याच्या डोंगरकडाचा काही भाग अचानक खचला. नंदू तिकोणे - यांच्या शेजारी राहणारे प्रत्यक्षदर्शी अक्षय भोसले या घटनेचा थरार सांगताना म्हणाले की, 'पहाटे ४ वाजेपर्यंत तिकोणे यांचे घर व्यवस्थित दिसत होते, मात्र ४ वाजून ५ मिनिटांनी स्फोटासारखा - मोठा आवाज झाला. त्यानंतर पाहिले तर तिकोणे यांचे घर गायब झाले होते'. किल्ल्यावरून खाली आलेल्या माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याने तिकोणे यांच्या घराचा घास घेतला. तिकोणे यांच्या शेजारी राहणाऱ्या पंकज तिकोणे यांच्या घरात रात्री १५ सदस्य होते, सुदैवाने ते बचावले असले तरी या घटनेने गावकरी सुन्न झाले आहेत.
मृतदेहांचा ढिगारा आणि शोधकार्य या दुर्घटनेत मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबातील चौथ्या महिलेचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. दरडीच्या तडाख्यात तिकोणे यांच्या घरासह सुमारे चार घरे आली होती, ज्यामध्ये अडकलेल्या अन्य ३० ते ३५ जणांना सुदैवाने सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.