महाराष्ट्र

शरद पवारांच्या बेगडी लोकशाहीप्रेमाचा बुरखा उतरविला; भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांची टीका

Swapnil S

जळगाव : लोकशाहीचा नारा देत राज्यघटनेविषयी आदर दाखवून उठता बसता शाहु-फुले आंबेडकरांचे नाव घेत आणि राज्यघटना व लोकशाहीच्या नावाने गजर करत राजकारण करणाऱ्या शरद पवार यांच्या एकाधिकारशाही राजकारणाचा बुरखा निवडणूक आयोगाने पुरता फाडला असून, एका व्यक्तीच्या दावणीला बांधलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची घराणेशाहीच्या राजकारणातून मुक्तता केली आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

घटना बासनात बांधून व पक्षाची ध्येयधोरणे मर्जीनुसार राबवून पक्षावर एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या शरद पवार यांच्या कारभारावर आयोगाने प्रकाशझोत टाकल्यामुळे पवार यांचे लोकशाही प्रेम व राज्यघटनेचा आदर बेगडी असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही खासदार उन्मेश पाटील यांनी केली.

गेल्या सहा महिन्यांत निवडणूक आयोगात अजित पवार व शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या याचिकांवर दहा सुनावण्या झाल्यांतर बहुमताचा पाठिंबा हा निकष लावून आयोगाने दिलेला निर्णय लोकशाही संकेतांचे पुरेपूर पालन करणारा असल्याची भावनाही खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांच्या कारकीर्दीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत कारभारात पारदर्शकतेचा अभाव असल्याची बाबही आयोगाने अप्रत्यक्षपणे नमूद केल्याने, जनतेसमोर बोलताना सातत्याने लोकशाही आणि राज्यघटनेचा संदर्भ देणाऱ्या शरद पवार यांचा एकाधिकारशाही व घराणेशाही वर्चस्ववादाचा चेहरा उघड झाला आहे, असेही ते म्हणाले. आता निवडणुकीच्या राजकारणात नव्याने सामोरे जाताना शरद पवार यांनी नव्या पक्षात पारदर्शकता व घटनात्मक शिस्तीचे पालन करावे व लोकशाहीचा आदर करावा अशी अपेक्षाही खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस