नवी दिल्ली : एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष दुभंगले गेले. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून तब्बल दीड वर्षांनंतर यासंदर्भात येत्या ७ आणि १४ मे रोजी सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकरणाचा निकाल विधानसभा निवडणुकीआधी लागणे अपेक्षित होते. पण ‘तारीख पे तारीख’मुळे या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा केल्यामुळे जून २०२२मध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस यांचे महायुतीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर काही महिन्यांनी अजित पवार यांनी ४० आमदारांसह महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले गेले. या दोन्ही पक्षांचे नाव आणि चिन्ह कोणत्या गटाकडे जाणार, याबाबतची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.
शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळावे, यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचे प्रकरण एकसारखे असल्याचे सांगत यावर सप्टेंबर २०२३ मध्ये पहिली सुनावणी झाली. त्यानंतर याप्रकरणी सुनावणी झाली नाही. दीड वर्षांनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे, या याचिकेवर ७ मे रोजी, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर १४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आता या सुनावणीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.