मुंबई : ‘अन्न व औषध प्रशासन विभाग हा राज्यातील १२ कोटींहून अधिक जनतेशी थेट जोडला गेला आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे हे कर्तव्य असून फाईव्ह स्टार असो वा स्ट्रीट फूड, प्रत्येकाला अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष तर कारवाई अटळ, असा थेट इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. वर्षांच्या १२ महिने प्रत्येक धर्मांचे सण येत असतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई विक्री करणाऱ्यांवर एफडीची करडी नजर असणार आहे. त्यामुळे याबाबत उद्या गुरुवारी नियमावली जारी करण्यात येईल, असे ही ते म्हणाले.
‘मुंबई प्रेस क्लब’ येथे बुधवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अन्न सुरक्षा, मिठाई, शालेय पोषण आहार, औषधे, रक्तपेढ्या आणि सणासुदीतील तपासणी मोहिमेबाबत अन्न व औषध प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांना आतापर्यंत ७०० हून अधिक नोटिसा बजावण्यात आल्या असून सुमारे १०० आस्थापनांनी त्याविरोधात अपील केले आहे. मात्र कारवाई करताना कोण प्रभावशाली आहे, कोण मोठा व्यावसायिक आहे किंवा कोणाची राजकीय पाठराखण आहे, याचा विचार केला जात नाही. कायदा सर्वांसाठी समान असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हे आमचेच उंदीर आहेत...
तपासणीदरम्यान काही धक्कादायक प्रकार समोर आल्याचेही त्यांनी सांगितले. एका खाद्य विक्रेत्याकडे मोठ्या प्रमाणात उंदरांचा वावर आढळला असता संबंधित मालकाने ‘हे आमचेच उंदीर आहेत’, असे उत्तर दिले. अशा प्रकारची कारणे प्रशासन स्वीकारणार नसल्याचे सांगत मुंढे यांनी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना ‘चुकीला माफी नाही...’, असा स्पष्ट संदेश दिला.
महाप्रसाद, भंडाऱ्यांनाही नियम लागू...
गणेशोत्सवात मंडळांकडून दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद आणि भंडाऱ्यांनाही अन्न सुरक्षा नियम लागू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक परवाने, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांचे पालन करणे प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पोषण आहाराचीही तपासणी सुरूच...
शाळा आणि अंगणवाड्यांमधील पोषण आहाराचीही तपासणी सुरू असून मुंबईतील अनेक केंद्रांची पाहणी करण्यात आली आहे. नियमभंग आढळलेल्या एका केंद्राचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच शाळांपासून ५० मीटर परिसरात विद्यार्थ्यांसाठी अपायकारक खाद्यपदार्थांच्या विक्रीवरील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.