मुंबई : आधी मतांची चोरी आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपात तथ्य आहे. निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास बसावा यासाठी व्हीव्हीपॅट, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असे पत्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयोगाला लिहिले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या व्हीव्हीपॅटवर घेता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. परंतु यापूर्वी मतांची चोरी झाल्याचे प्रचंड गंभीर आरोप विविध राज्यांतील राजकीय पक्षांकडून वारंवार निवडणूक आयोगावर झाले आहेत. अशातच पुन्हा व्हीव्हीपॅटचा वापर करणार नाही, अशी भूमिका निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे राजकीय पक्षांनी केलेल्या आरोपांची पुष्टी होते, असे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत असा दावा केला की सत्ताधारी महायुतीने राज्याला विकासात शेवटच्या स्थानावर आणि भ्रष्टाचारात अव्वल स्थानावर नेले आहे.
...तर लोकांचा पारदर्शकतेवर विश्वास बसेल!
निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि लोकांचा संभ्रम दूर करावा, अशी आमची भूमिका आहे आणि म्हणूनच आपणास विनंती करण्यात येते की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका या सर्व निवडणुका व्हीव्हीपॅट किंवा बॅलेट पेपरवर घ्याव्यात, जेणेकरून लोकांना आपल्या पारदर्शकतेवर विश्वास बसेल आणि निवडणुका सुरळीत पार पडता येतील. आमच्याकडून प्राप्त पत्राची दखल घेत अंमलबजावणी कराल, अशी अपेक्षा असल्याचे वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.