मुंबई : मुंबई महापालिकेने कुलाबा कॉजवे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई केल्यानंतरही या फेरीवाल्यांनी येथे बस्तान बसवलेले आहे. यामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. तसेच स्थानिकांनी अनधिकृत नागरिकांना बसण्यास मज्जाव केला तर फेरीवाले त्यांच्यावर अरेरावी करत आहेत. त्यामुळे पालिकेने केलेली कारवाई हा निव्वळ ढोंगीपणा असून या फेरीवाल्यांना पालिकेचे अभय असल्याचे मत येथील नागरिक व्यक्त करत आहे.
काही दिवसांपूर्वी कुलाबा रहिवाशांनी अतिक्रमण हटावची मागणी केल्यानंतर आणि एक आठवड्याची मुदत देऊन ए वॉर्ड कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची धमकी दिली होती, यानंतर पालिकेने कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत स्टॉल्ससह बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाई केली. या कारवाई अंतर्गत वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या कुलाबा कॉजवे येथील एकूण ६७ अनधिकृत फेरीवाल्यांवर निष्कासन कारवाई केली. मात्र, यानंतरही येथे अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेचे कर्मचारी येऊन कारवाई करतात परंतु त्यांची पाठ फिरल्यावर अनधिकृत फेरीवाले येथे बसतात. त्यामुळे पालिका कर्मचारी आणि येथील फेरीवाल्यांचे संगनमत असल्याचे आरोप येथील नागरिकांनी केले.
सध्या आम्ही फेरीवाल्यांविरोधात कोणतीही कारवाई करणार नाही. निवडणुका समोर आहेत त्यामुळे आम्ही कोणाला दुखवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिक नेत्याने दिली.
पालिकेच्या ए विभागामार्फत गेले काही दिवस सकाळ - संध्याकाळ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. या कारवाई अंतर्गत आतापर्यंत १४० अनधिकृत फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेले सामान कुर्ला, चेंबुर, मालाड या ठिकाणच्या गोदामांमध्ये ठेवण्यात येत आहे. तर कारवाईनंतर फेरीवाले सामान सोडवून नेतात.
- जयदीप मोरे, सहाय्यक आयुक्त
आम्ही कुलाबावासीयांनी आतापर्यंत पालिकेला १०० हून अधिक पत्र लिहिले. मात्र, पालिका केवळ कारवाईचे नाटक करत आहे. राजकीय नेते निवडणुका नजरेसमोर ठेवून पुढे येत आहेत. आम्हाला फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी आहे. परंतु, पालिकेने त्यांचे पुनर्वसन योग्य त्या ठिकाणी करावे. जेणेकरून ज्याचा त्रास आम्हाला स्थानिकांना होणार नाही.
- परवेझ, कुलाबा रहिवासी