मुंबई : कॉमेडियन सुनील पाल यांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपहरणकर्त्यांनी ८ लाख रुपयांची खंडणी घेऊन पाल यांची उत्तर प्रदेशातील मीरत येथे मुक्तता केली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांकडे सोपवला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे अपहरण करण्यात आले होते. उत्तराखंडमध्ये ते एका कार्यक्रमासाठी गेले होते. चहापानासाठी रस्त्यात एका दुकानाजवळ थांबलेले असताना एका माणसाने त्यांना कारमध्ये बळजबरीने बसवून अज्ञात ठिकाणी नेले. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र पाल यांनी कसेबसे ८ लाख रुपये मित्रांकडून जमवून त्यांना दिल्यावर अपहरणकर्त्यांनी त्यांची सुटका केली.
पाल बेपत्ता असल्याची तक्रार
अपहरणकर्त्यांनी आपल्याला मिरत येथे एका रस्त्याच्या कडेला सोडून दिले. त्यानंतर आपण तेथून दिल्ली विमानतळावर येऊन विमानाने मुंबईकडे रवाना झालो, असा दावा पाल यांनी केला असल्याचेही सांताक्रुझ पोलिसांनी सांगितले. पाल यांच्या पत्नीनेही काही दिवसांपूर्वी पाल हे बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती.