मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने आतापर्यंतची सर्वात कमी जागा जिंकल्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा पक्षातील गटबाजी उफाळून आली. नैतिक जबाबदारी स्वीकारून शहर अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, ज्या 'प्रतिकूल' परिस्थितीत निवडणुका झाल्या, ते पाहता पक्षाची कामगिरी समाधानकारक होती. तर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी गायकवाड यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. उमेदवारांची निवड केली जात होती तेव्हा मला सांगण्यात आले की, सर्वेक्षणानुसार तिकिटांचे वाटप केले जात आहे. त्यावेळी मी आक्षेप घेतला नाही. मी जेव्हा सर्वेक्षण मागितले तेव्हा ते मला दाखवण्यात आले नाही, असे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी पीटीआय व्हिडिओला सांगितले. काँग्रेसची कामगिरी ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
२२७ सदस्यीय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या ३१ जागांवरून आता २४ जागांवर घसरण झाल्याने गायकवाड यांच्यावर टीका होत आहे.
या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांशी युती केली नाही. त्यांनी १५२ जागा लढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी (वंचित), आरएसपी आणि आरपीआय (गवई) यांच्याशी युती केली होती. तथापि, मित्रपक्षांना एकही जागा मिळाली नाही. महत्त्वाच्या निवडणुकीत भाजपने उद्धव ठाकरे यांच्याकडून बीएमसीची सत्ता हिसकावून घेतली आणि श्रीमंत महानगरपालिकेत त्यांच्या कुटुंबाचे तीन दशकांपासूनचे वर्चस्व संपुष्टात आणले.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता उघड झाला असून मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या विरोधात केलेले वक्तव्यामुळे विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांना पक्षाने दणका दिला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली असून ७दिवसांच्या आत उत्तर देण्याचे
आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाई जगताप यांनी उघडपणे वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ही विधाने इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. पक्षाची अंतर्गत बाब चव्हाट्यावर आणल्याने पक्षनेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली आहे.
शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार
महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या सूचनेनुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. जर भाई जगताप यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही, तर त्यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची किंवा इतर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नोटीसमुळे मुंबई काँग्रेसमधील राजकीय वातावरण तापले आहे.