नवी दिल्ली : कुविख्यात गुंड दिवंगत इक्बाल मोहम्मद मेमन उर्फ इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने सोमवारी मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करत मिर्ची आणि त्याच्या परिवाराशी संबंधित तब्बल ७००.२७ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली.
जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील वरळी येथील तीन प्रमुख मालमत्तांचा समावेश असून त्यांची किंमत सुमारे ४९७ कोटी रुपये आहे. याशिवाय फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत दुबईतील सुमारे २०३.२७ कोटी रुपयांची परदेशी मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी इक्बाल मिर्चीविरुद्ध भारतीय दंड संहिता, शस्त्र कायदा, टाडा आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत नोंदवलेल्या अनेक गुन्ह्यांच्या आधारे ईडीने हा तपास सुरू केला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार आणि १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला मिर्ची ब्रिटनला पळून गेला होता. अंमली पदार्थांची तस्करी, खंडणी आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या व्यवसायातून कमावलेला पैसा मिर्चीने भारत आणि परदेशात कुटुंबिय तसेच कंपन्यांच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरल्याचे तपासात उघड झाले आहे.
याप्रकरणी ईडीने मुंबईतील विशेष न्यायालयात मिर्चीचा मुलगा आसिफ, जुनैद आणि पत्नी हाजरा मेमन यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयाने फेब्रुवारी २०२१ मध्ये या तिघांनाही फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. वरळीतील राबिया मॅन्शन, मरियम लॉज आणि सी व्ह्यू या मालमत्तांवर मिर्चीचेच नियंत्रण होते आणि कायदेशीर कारवाईतून सुटका करण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली होती, असेही ईडीने नमूद केले. इक्बाल मिर्चीचा ६३ व्या वर्षी १४ ऑगस्ट २०१३ रोजी लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.