मुंबई : घाटकोपर येथे मे २०२४ मध्ये घडलेली होर्डिंग दुर्घटना हा निव्वळ अपघात नसून गुन्हेगारी कट आणि प्रशासकीय अपयशाचा धक्कादायक प्रकार असल्याचे चौकशी समितीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी, पालिकेचे अधिकारी आणि जाहिरातदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने केली. दुर्घटनेत १७ नागरिकांचा बळी गेला होता, तर ७४ जण जखमी झाले होते.
विधिमंडळ अधिवेशनात मंगळवारी ८५४ पानांचा हा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला. खासगी संस्था व सरकारी अधिकाऱ्यांनी संगनमत करून पालिकेचे नियम धाब्यावर बसवल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे समितीने नमूद केले. दोषींवर गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून दुर्घटनेच्या नुकसानीची वसुली करून कठोर कारवाई करावा, असेही अहवालात म्हटले आहे. समितीमध्ये आयआयटी मुंबईचे प्रा. दीपांकर चौधरी, अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी, अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता, मंत्रालयातील उपसचिव चेतन निकम यांचा समावेश होता.