Mumbai : मानखुर्दमध्ये पोलिसाचा मृत्यू; उड्डाणपूल कामातील अपघातांची मालिका सुरुच 
मुंबई

Mumbai : मानखुर्दमध्ये पोलिसाचा मृत्यू; उड्डाणपूल कामातील अपघातांची मालिका सुरुच

मुंबईतील मानखुर्द परिसरात एका निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या ठिकाणी अवजड ‘पायलिंग रिग’ कोसळून एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात एका निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या ठिकाणी अवजड ‘पायलिंग रिग’ कोसळून एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. संतोष गोपाळ चव्हाण असे या मृत पोलिसाचे नाव आहे. सायन-पनवेल महामार्गावर उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हे काम सुरू असताना हा अपघात झाला. चव्हाण हे आपल्या मोटारसायकलवरून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला.

मानखुर्द पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या पायाभरणीसाठी वापरले जाणारे ‘पायलिंग रिग’ अचानक कोसळले आणि चव्हाण यांच्या अंगावर पडले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. चव्हाण हे नेहरू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि सध्या चेंबूर येथील पूर्व नियंत्रण कक्षात प्रतिनियुक्तीवर होते.

यापूर्वी १५ एप्रिलला वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) मेट्रोच्या कामावेळी एक मोबाईल क्रेन उलटली होती, मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. तसेच फेब्रुवारी महिन्यात मुलुंड परिसरातील मेट्रो रेल्वेच्या पुलाचा गर्डर कोसळून एकाचा मृत्यू झाला होता, तर तीन जण जखमी झाले होते.

कंत्राटदारांचा निष्काळजीपणा

या दुर्घटनेच्या प्राथमिक तपासानुसार, ‘पायलिंग रिग मशीन’ ज्या जमिनीवर उभी केली होती, ती जमीन भुसभुशीत असल्याने तिचा तोल गेला असावा, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी कंत्राटदाराविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कंत्राटदार आणि साइट सुपरवायझर यांच्या भूमिकेची तसेच बांधकाम ठिकाणी अनिवार्य सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन झाले होते का, याची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

EPFO वेतन मर्यादा आता २५ हजारांपर्यंत

यूजीसीचे नियम कायदा बनणार नाही - मोहन भागवत

पाणी संकटासाठी टंचाई कृती आराखडा; गावांची यादी तयार करण्याची सूचना