मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील एका वॉन्टेड आरोपीला अटक केली असून, त्याला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. व्यंकटेशन के. उडयार असे या आरोपीचे नाव असून या प्रकरणात गुंतवणूकदारांची सुमारे १२५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुरुवात जयपाल कौंदर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून झाली. कौंदर, त्यांची पत्नी आणि इतर अनेक गुंतवणूकदारांची मुख्य आरोपी आशिष शाह याने फसवणूक केल्याचा आरोप आहे. शाह याने त्याची "समरेश ट्रेडर्स एलएलपी" ही संस्था सेबीकडे नोंदणीकृत असल्याचा खोटा दावा केला होता आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीवर एका वर्षात ८४% परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. जेव्हा तक्रारदाराने पैसे परत करण्याची मागणी केली, तेव्हा आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी ११ जुलै २०२४ रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आणि २४ फेब्रुवारी २०२५ रोजी या गुन्ह्याची पुन्हा नोंदणी करण्यात आली. त्यानंतर केलेल्या तपासात, एकूण १७३ गुंतवणूकदारांची अंदाजे १२५.३७ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ११ व्यक्ती आणि ३ कंपन्यांसह (समरेश ट्रेडर्स एलएलपीसह) एकूण १४ आरोपींची ओळख पटवली आहे.