मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशातील कमाल तापमान पुढील चार दिवसांत ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी (संपूर्ण कोकण विभाग) या जिल्ह्यांसाठी मंगळवार, ६ मे ते शुक्रवार, ९ मे या कालावधीत 'उष्ण आणि दमट हवामानाचा' यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या विशेष बुलेटिननुसार, उत्तर कोकण आणि मुंबईत कमाल आणि किमान तापमान 'सरासरीपेक्षा जास्त' असेल. पुढील २४ तासांत महाराष्ट्रात कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होईल. मंगळवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जेऊर येथे ४२.५°C इतकी झाली.