मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बेस्ट कामगार कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कामगारांच्या प्रश्नावर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आणि कृती समितीने संप मागे घेतल्याचे जाहीर केले. तीन दिवसांच्या संपानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी बेस्ट बसेसची व्यवस्था कोलमडली. सोमवारी दिवसभरात फक्त २ हजार बसेस प्रवासी सेवेत चालवण्यात आल्याने प्रवाशांना आजही त्रास सहन करावा लागला.
बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेत विलीन करणे, स्वमालकीच्या पाच हजार बसेसचा ताफा दाखल करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देणे अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली गुरुवार १८ जूनच्या मध्यरात्रीपासून संपाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवार, शनिवार व रविवार तीन दिवस संप सुरू राहिल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
बेस्ट, मुंबई महापालिका अन् राज्य सरकार बेस्ट कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने मुंबईकर आणि बेस्ट उपक्रमाचे काही पडले नसल्याचा संताप मुंबईकरांनी व्यक्त केला. शुक्रवारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक पार पडली. मात्र बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने अखेर रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली.