मुंबई : मुंबईतील वाढत्या बांधकाम प्रकल्पांमुळे दररोज मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या बांधकाम व पाडकाम (सी अँड डी) कचऱ्याच्या वैज्ञानिक व्यवस्थापनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे.
बांधकाम व पाडकाम दोन हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मुंबई शहर व दोन्ही उपनगरात प्लांट उभारण्यात येणार आहे. या प्लांटमध्ये बांधकाम व पाडकामाच्या मलब्यापासून वाळू, खडी, पेव्हर ब्लॉकची निर्मिती करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे प्रदूषणमुक्त मुंबईसाठी बांधकाम व पाडकाम कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर जीपीएस सिस्टिम बसवणे बंधनकारक असणार आहे.
मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे अशा तीन विभागांमध्ये स्वतंत्र सुविधा उभारण्यात येणार आहेत. या सुविधांची एकत्रित प्रक्रिया क्षमता सुमारे दोन हजार टन प्रतिदिन (टीपीडी) इतकी असेल. सध्या मुंबईत बांधकाम आणि पाडकामातून दररोज ८ हजार मेट्रिक टन डेब्रिज निर्माण होत असून त्यातील मोठा हिस्सा रस्त्यांच्या कडेला, नाल्यांमध्ये किंवा मोकळ्या जागांमध्ये टाकला जातो. त्यामुळे प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि पूरस्थिती निर्माण होण्यास मदत होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
अडथळे कमी होणार
प्रकल्पामुळे अनधिकृतपणे मलबा टाकण्याच्या प्रकारांवर आळा बसण्याबरोबरच नाले आणि जलवाहिन्यांमध्ये होणारे अडथळे कमी होतील तसेच पुनर्नवीनीकरण केलेल्या साहित्याचा वापर वाढल्यास विविध प्रकल्पांचा खर्चही कमी होऊ शकतो.
पालिकेने मागवले ईओआय
मुंबई शहरात एकात्मिक बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया सुविधा उभारण्यासाठी पालिकेने स्वारस्य अभिव्यक्ती (ईओआय) मागवली आहे. या अंतर्गत सुविधा उभारणे, अर्थपुरवठा, बांधकाम, संचालन आणि देखभाल करण्यासाठी खासगी एजन्सीची निवड करण्यात येणार आहे.