गिरीश चित्रे / मुंबई
मुंबईतील फुटपाथ हे मुंबईकरांना चालण्यासाठीच असून त्या दृष्टीने बेकायदा फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरु आहे, असे मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले आहे. दैनिक ‘नवशक्ति’ला दिलेल्या खास मुलाखतीत त्या बोलत होत्या. रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यांवर बेकायदा फेरीवाले हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे असेही त्यांनी या संदर्भात नमूद केले.
पालिकेच्या माध्यमातून बांधकामांच्या साइट्सवर वेळोवेळी तपासणी करण्यात येत असल्याने मुंबईतील एक्यूआय आता कमी झाला आहे, अशी माहिती देऊन भिडे म्हणाल्या की, मुंबईत सद्यस्थितीत तीन हजार बांधकामांचे प्रकल्प सुरू आहेत. बांधकाम ठिकाणी धुळीचे कण हवेत पसरु नये यासाठी यापूर्वी नियमावली जारी केली आहे. शिवाय, बांधकामांच्या ठिकाणी सेन्सर मशीन बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित बांधकामांच्या ठिकाणी एक्यूआय बरोबर आहे की नाही यावर डॅशबोर्डच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. तसेच एखाद्या बांधकाम ठिकाणी नियमावलीचे पालन केले जात नाही, तर त्याठिकाणी पालिकेचे अधिकारी जाऊन तपासणी करतात आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात येते.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, समुद्राचे खारे पाणी गोडे करणे, वर्सोवा दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग असे विविध प्रकल्प मुंबई महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या खर्चासाठी ग्रीन बॉण्ड्स निर्गमित करण्याचे योजिले आहे. केंद्र सरकारचे फंड, अर्बन चॅलेंज फंड हे मिळवण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे, असेही भिडे यांनी सांगितले.
मुदतठेवीत भर घालणार
मालमत्ता करातून यंदा विक्रमी महसूल प्राप्त झाला. दर महिन्याला जीएसटी प्राप्त होतो. डेव्हलपमेंट चार्जेस, मुंबई महापालिकेने विविध प्रकल्प हाती घेतले असून त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प सुरू असून त्या प्रकल्पांसाठी मुदत ठेवीत रक्कम वापरली जाते. परंतु पालिकेला महसूल प्राप्त झाल्यानंतर काही रक्कम मुदत ठेवीत जमा केली जाते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी कमी न होता त्यात भर पडावी यासाठी नियोजन केले जात असल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले.