मुंबई : शिक्षण संचालनालयाने दहावी निकालानंतर राज्यातील अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी यंदा ४ लाख ७६ हजार जागा २५० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात १ लाख ६० हजार ८४० जागांचा समावेश आहे. यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विद्यार्थी दहावी परीक्षेत पास झाले असल्याने यंदाही अकरावीच्या अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
दहावी परीक्षेत मुंबई विभागातून ३ लाख ७ हजार ४८० विद्यार्थी पास झाले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेणार आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी चांगले महाविद्यालय मिळावे, यासाठी विद्यार्थांमध्ये चुरस लागणार आहे. जागा जास्त शिल्लक राहत असल्यामुळे सर्वांना प्रवेश मिळणार आहे. मात्र, आवडीचे महाविद्यालय मिळावे, यासाठी पास झालेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहेत.
अशा आहेत जागा
मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी यंदा ४ लाख ७६ हजार जागा २५० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा मुंबई शहर आणि उपनगरात उपलब्ध आहेत. या दोन जिल्ह्यात १ लाख ९९ हजार ७० जागा उपलब्ध आहेत. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात १ लाख ६० हजार ८४० जागांचा समावेश आहे तर पालघर जिल्ह्यात ६६ हजार ६२० आणि रायगड जिल्ह्यात ४९ हजार ७२० जागा उपलब्ध आहेत.
मुंबई शहरातून २४ हजार ४५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर पश्चिम उपनगरातून ४८ हजार ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पूर्व उपनगरातून ३९ हजार २१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
ठाणे जिल्ह्यातून १ लाख १० हजार ९०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ५ हजार ४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या जिल्ह्याचा निकाल ९५.०४ टक्के लागला आहे.
रायगड जिल्ह्यातून ३५ हजार २१७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३३ हजार ४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९५.०३ टक्के आहे.
पालघर जिल्ह्यातून ६० हजार ५५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५६ हजर २६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या जिल्ह्याचा निकाल ९२.९२ टक्के लागला आहे.