मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणारे मेट्रो लाईन ९ आणि मेट्रो लाईन २ बी या दोन नव्या मेट्रो मार्गांचे निवडक टप्पे ३१ डिसेंबरपर्यंत प्रवाशांसाठी खुले होणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या अधिकाऱ्यांनी दोन्ही मार्गांच्या आंशिक उद्घाटनासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे.
मेट्रो लाईन ९ ही विद्यमान मेट्रो लाईन ७ची विस्तारित लाईन असून तिची एकूण लांबी १३.५८ किमी आहे. दहिसर पूर्व आणि वेगाने विकसित होत असलेल्या मीरा-भाईंदर परिसरातील दळणवळण अधिक मजबूत करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व ते काशीगावदरम्यान मेट्रो सेवा सुरू होणार असून त्यामुळे उत्तर उपनगरांतील प्रवासाचा वेळ कमी होण्यासह वाहतूककोंडीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. लाईन ९ वरील नव्याने उभारण्यात आलेल्या स्थानकांवर मेट्रो गाड्या उभ्या असल्याचे दृश्य समोर आल्याने या मार्गाची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचे स्पष्ट होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार स्थानके, ट्रॅक आणि रोलिंग स्टॉक मोठ्या प्रमाणावर तयार असून अंतिम सुरक्षा तपासणी व एकत्रीकरणाशी संबंधित परवानग्यांची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मुंबईभर मेट्रोचे जाळे विणले गेले असून काही सेवा सुरू झाल्या असून लाखो मुंबईकर मेट्रो सेवेचा लाभ घेत आहेत. यामुळे उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी झाला आहे.
प्रवाशांना दिलासा
मेट्रो लाईन ९, मेट्रो लाईन २ बी हे नवे मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईतील सर्वाधिक गजबजलेल्या रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर रस्ते वाहतुकीवर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
रेल्वेवरचा गर्दीचा ताण कमी होणार
मेट्रो लाईन ९ ही मेट्रो लाईन ७ शी अखंडपणे जोडली जाणार असून त्यामुळे अंधेरी (पूर्व) ते मीरा-भाईंदरदरम्यान अधिक सुलभ आणि वेगवान संपर्क उपलब्ध होईल. यामुळे आधीच ताणाखाली असलेल्या उपनगरी रेल्वे सेवांवरील तसेच मुख्य रस्त्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.
वाढत्या प्रवासी गरजा भागवणार
मेट्रो लाईन २बीच्या काही टप्प्यांचेही समांतरपणे उद्घाटन होणे हे मुंबई मेट्रो जाळ्याच्या सातत्यपूर्ण विस्ताराचे द्योतक आहे. शहरातील शहरी वाहतूक आधुनिक, सुरक्षित, एकात्मिक आणि शाश्वत करण्याच्या सरकारी धोरणात मेट्रो प्रकल्प केंद्रस्थानी असून वाढत्या प्रवासी गरजा पूर्ण करण्यासाठी हा विस्तार महत्त्वाचा ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.