मुंबई

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या नव्या मार्गामुळे लोणावळा-खंडाळा घाट विभागातील वाहतूक ताण कमी होऊन प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी घटण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला हलकी वाहने आणि प्रवासी बससाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे.

Mayuri Gawade

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.१) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याच्या पायाभूत सुविधा विकासातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्या मार्गावर स्वतः कार चालवत प्रवासही केला.


प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे लोणावळा-खंडाळा घाट विभागाला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास सुमारे ३० मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच दोन्ही शहरांमधील अंतरही अंदाजे ६ किलोमीटरने घटणार आहे.

१ मे ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात फक्त हलकी वाहने आणि प्रवासी बसना या मार्गावर प्रवेश दिला जाणार आहे. महाराष्ट्र वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, या काळात मालवाहू वाहनांना परवानगी नसणार आहे.

सहा महिन्यांनंतर परिस्थितीचा आढावा घेत जड वाहनांना प्रवेश द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी कारसाठी १०० किमी प्रतितास आणि प्रवासी बससाठी ८० किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना

सुमारे १३.३ किलोमीटर लांबीचा हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. या मार्गामध्ये सुमारे ८.९२ किलोमीटर लांबीचा बोगदा असून, जगातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्यांपैकी दोन बोगदे येथे उभारण्यात आले आहेत. त्यांची रुंदी सुमारे २३.७५ मीटर आहे.

या प्रकल्पात उंच पुलांचा समावेश असून, टायगर व्हॅली परिसरात सुमारे १८२ मीटर उंचीवरील केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मार्ग लोणावळा तलावाखालून जात असल्याने हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचा मानला जातो.

वाहतूक कोंडीवर दिलासा मिळणार

२००२ मध्ये सुरू झालेल्या आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दररोज सुमारे ७५ हजार वाहने प्रवास करतात. विकेंड आणि सुट्ट्यांच्या काळात ही संख्या १.२ लाखांपर्यंत पोहोचते, त्यामुळे घाट विभागात अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते.

नव्या ‘मिसिंग लिंक’ मार्गामुळे घाटातील वाहतुकीवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. राज्यातील दोन प्रमुख आर्थिक केंद्रांमधील संपर्क अधिक वेगवान आणि प्रभावी होणार आहे.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी