मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने शनिवारी (दि. ४) उपनगरी रेल्वे सेवेचा खोळंबा झाला. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने गर्दीच्या वेळेत अनेक प्रवाशांचे हाल झाले.
मध्य रेल्वेवर सर्वाधिक परिणाम
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून कल्याणकडे जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्यांनाही जवळपास ३० मिनिटांचा विलंब झाला.
पश्चिम आणि हार्बर मार्गावरील सेवाही प्रभावित
पश्चिम रेल्वेवरील विरार-चर्चगेट लोकल सेवाही सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि अन्य प्रवाशांना मोठा फटका बसला. दरम्यान, हार्बर मार्गावरील लोकल गाड्याही सुमारे १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली.
पाणी साचल्याने आणि खबरदारीमुळे विलंब
अनेक भागांत पाणी साचणे, दृश्यमानता कमी होणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे गाड्यांचा वेग कमी ठेवण्यात आल्याने उपनगरी रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मात्र, सर्व लोकल सेवा सुरू असून, प्रवासापूर्वी अधिकृत अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.
महापालिकेची परिस्थितीवर नजर
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आयुक्त अश्विनी भिडे यांनी आयएमडीच्या रेड अलर्टनंतर आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. शहरातील सुमारे १०,००० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, जवळपास १०,००० महापालिका कर्मचारी आणि सर्व २६ प्रभाग कार्यालये सतर्क ठेवण्यात आली आहेत.
शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन ४ जुलै रोजी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे बीएमसीने स्पष्ट केले असून, नागरिकांनीही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.