मुंबई : कचरा करण्याची सवय आणि अन्नपदार्थाच्या गाड्यांवरून फेकला जाणारा कचरा यामुळे मुंबईत सर्वत्र उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. लाखोंच्या संख्येने असलेले उंदीर जमिनीचा पाया भुसभुशीत करत आहेत. पालिकेच्या कीटकनाशक विभागाने के पूर्व विभागातील सहार गावात ३ जुलैच्या एका रात्रीत ३१९ मोठे उंदीर मारले आहेत. त्यामुळे पशुगणनेप्रमाणे या उंदीरांची देखील जनगणना करण्यात यावी, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यापासून मैदान, गोदाम, निवासी इमारती, कॉर्पोरेट कार्यालय ते अगदी मॉल आणि सिनेमागृहातही उंदीर आणि घुशी वाढल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत असतात. यासाठी अस्वच्छता, रस्त्यावर पडलेला कचरा, अन्न कचरा यामुळे उंदरांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी, सर्वत्र लेप्टोस्पायरोसिसचे जंतू पसरत आहेत. त्यामुळे पालिकेकडून उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. याशिवाय प्लेगच्या विषाणूंची चाचणीही केली जाते. मात्र उंदरांचा आजाराशी सध्या थेट संबंध लागत नसल्याने उंदीर मारण्याबाबतचे गांभीर्य कमी झाले आहे.
पालिकेने विशेष लक्ष देऊन कचारा व्यवस्थापनात सुधारणा केली पाहिजे. कचऱ्याचे डब्बे झाकलेले पाहिजे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यावर भर दिला पाहिजे, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनच्या गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.